जालना : येथील छत्रपती संभाजीनगर रोडवरील एमआयडीसी फेज-3 मधील ठिबक सिंचन साहित्य बनविणाऱ्या कारखान्याला गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशामक विभागाच्या चार बंबानी ही आग दोन तासांत आटोक्यात आणली.
जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील एमआयडीसी फेज-3 मधे असलेला ठिबक सिंचनचे साहित्य बनविणाऱ्या कारखान्यात गुरुवारी अचानक आग लागली. कारखान्यात प्लास्टिक साहित्य असल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केल्याचे दिसून आले.यावेळी आगीमुळे परिसरात काळा धूर पसरला होता.
कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आग लागल्याची माहीती अग्निशामक दलास दिली. त्यानंतर चार बंबांनी ही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.सदर आग परिसरात पसरण्याची भिती असल्याने परिसरातील कारखानदारांच्या चिंता वाढली होती.
घटनास्थळी मोठा जमाव जमल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी अडथळा होऊ नये यासाठी मदत केली.
जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील कारखाण्याचे फायर ऑडिट नियमित करण्यात येते का हा प्रश्न या आगीच्या घटनेमुळे समोर आला आहे. आग लागली तेव्हा कारखान्यात आग विझविण्यासाठी यंत्रणा नव्हती का असा प्रश्नही विचारला जात आहे.