Manoj Jarange Patil
जालना: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत. "सरकारला कितीही मायेने सांगितले तरी ते आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसणार नाहीत," अशा कडक शब्दांत टीका करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. येत्या १६ मे रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा आणि तारीख जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी आज दिली.
जालना येथे माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, सरकारला मराठा समाजाची कामे होऊ द्यायची नाहीत. मराठ्यांची मुले आज कर्जबाजारी होत आहेत आणि या परिस्थितीला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. सरकार जाणूनबुजून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "आता शांत बसून चालणार नाही. जर आपल्याला आपले हक्क मिळवायचे असतील, तर समाजातील प्रत्येक बांधवाला पुन्हा एकदा कट्टरतेने आंदोलनाच्या पवित्र्यात यावे लागेल." राज्यात पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.