तळणी : मंठा तालुक्यातील इंचा-टाकळखोपा-वाघाळा या चार किलोमीटर रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येऊनही सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप आहे. प्रशासनाच्यावतीने खड्डे पडलेल्या रस्त्यावर डागडुजी करण्यात येत आहे.दरम्यान या रस्त्याविरोधात तीन गावांतील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. रस्त्याच्या प्रश्नावर सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशी मागण्या मान्य झाल्याने उपोषण सोडण्यात आले.
इंचा-टाकळखोपा-वाघाळा या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी पाच दिवसांपासून उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने दखल घेत रस्त्यावर ठिगळ लावण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र ही केवळ तात्पुरती डागडुजी असून मूळ प्रश्न कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच कोटी रुपये खर्चूनही रस्ता काही महिन्यांत उखडतो, ही बाब गंभीर आहे. ठिगळे नव्हे तर दर्जेदार रस्ता हवा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
दरम्यान, टाकळखोपा गावात नाल्याच्या खोदकामास सुरुवात करण्यात आली आहे. मात्र सध्या खोदल्या जात असलेल्या नाल्या या फक्त चर स्वरूपातील असून काही दिवसांत त्या पुन्हा बुजल्या जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पक्क्या सिमेंट काँक्रिट नाल्या करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रस्त्याचे काम सुरू असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित अधिकारी रस्त्याचे काम सुरू असताना पाहणीसाठी फिरकले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे तहसीलदार सुमन मोरे यांनीही लक्ष दिले नसल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
उपोषणकर्त्यांनी सरकारी डॉक्टर कडून तपासणी नाकारल्यानंतर उपोषणकर्ते अरुण कांगणे यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची खाजगी डॉक्टरच्या साह्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान अरुण कांगणे यांचा रक्तदाब कमी झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले .भाजपा तालुका उपाध्यक्ष शरद पाटील , नितिन सरकटे, सामाजिक कार्यकर्ते उध्दव पवार, उबाठा शिवसेना अध्यक्ष प्रदीप बोराडे, विजय चव्हाण, यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला होता.
प्रस्तावित परिपत्रकात सिमेंट नाल्यांची तरतूद नसून त्यासाठी स्वतंत्र निधीची मागणी शासनस्तरावर करावी लागेल. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तसा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.भगवान शिंदे, उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग
संबंधित गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्या मजबूत करणे गरजेचे आहे. गावातील सुमारे 700 ते 900 मीटर रस्ता नव्याने मजबुतीकरणासह करणे आवश्यक आहे. मात्र संपूर्ण सहा किलोमीटर रस्ता सिमेंट काँक्रिटचा करावा.अरुण कांगणे, उपोषणकर्ते (वाघाळा)