

जालना : शहरातील स्वच्छता आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महापौर वंदना मगरे यांनी महानगरपालिकेत तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शहरात स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याचे निर्देश महापौर वंदना मगरे यांनी प्रशासनाला दिले.
बैठकीस उपमहापौर राजेश राऊत, सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण, तसेच स्वच्छता निरीक्षक व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान स्वच्छता निरीक्षकांनी शहरातील वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर घंटागाडी, जेसीबी, ट्रॅक्टर व अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याचे मांडले.
यावर महापौरांनी तातडीने चार ट्रॅक्टर, 20 कामगार आणि एक जेसीबी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच शहर स्वच्छतेसाठी स्वतंत्र स्वच्छता समिती स्थापन करून अधिक प्रभावी कामकाज करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापौर मगरे यांनी बैठकीत नागरिकांनाही स्वच्छतेच्या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.
अंबड येथील तसेच जे.ई.एस. कॉलेज मागील पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर जालना शहराला एक दिवसाआड नियमित पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाला गळती रोखणे आणि वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
अतिक्रमणाविरोधात लवकरच कारवाई
शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणाबाबतही बैठकीत चर्चा झाली. नागरिकांनी स्वतः अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा महानगरपालिकेकडून लवकरच कारवाई सुरू करण्यात येईल, असा इशारा महापौर वंदना मगरे यांनी दिला.