Manoj Jarange Patil Protest Pudhari
जालना

Manoj Jarange Patil: जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस; आंदोलकाचा हृदयविकाराने मृत्यू, धाराशिव-परभणीत बंद, कोणत्या मागण्या मान्य?

Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सहावा दिवस असून, सरकारसोबतच्या चर्चेनंतर त्यांनी पाणी आणि सलाईन घेण्यास सुरुवात केली आहे; मात्र आंदोलन अद्याप सुरूच आहे.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Protest: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली असली, तरी सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी पाणी घेण्यास आणि सलाईन लावून घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आंदोलन मागे घेण्याबाबत त्यांची भूमिका अद्याप कायम असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत दाखल झालेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुसरीकडे आंदोलनाच्या समर्थनार्थ धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला असून, काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

सरकारसोबतच्या चर्चेनंतर जरांगे काहीसे नरमले

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.

जरांगे यांच्या सुमारे 90 टक्के मागण्या मान्य झाल्या असल्याचे महाजन यांनी सांगितले. मराठा समाजाला यापूर्वीही आरक्षण देण्यात आले होते, मात्र त्यानंतर ते रद्द झाले, असा दावा त्यांनी केला. राज्यात मराठा समाजातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर प्रमाणपत्रे देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

चर्चेनंतर जरांगे यांनी पाणी घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना सलाईनही लावण्यात आले. मात्र, यामुळे आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेले नसून प्रमुख मागण्यांवर निर्णय होईपर्यंत त्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू

दरम्यान, आंदोलनस्थळी आलेल्या बीड जिल्ह्यातील दशरथ रायकर यांचा मृत्यू झाला. ते संगम, जिल्हा बीड येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

रायकर हे जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवाली सराटीत आले होते. बुधवारी रात्री त्यांनी एका शेतात मुक्काम केला होता. गुरुवारी सकाळी बराच वेळ उलटूनही ते उठले नाहीत. त्यामुळे उपस्थितांनी त्यांना तातडीने अंबड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको

जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चित्तेपिंपळगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी काही काळ वाहतूक रोखून धरली.

या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.

3 सप्टेंबरपासून प्रमाणपत्र वाटपाचे आश्वासन

सरकारच्या चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आमदार लाड यांनी 3 सप्टेंबरपासून हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

तसेच जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे आणि आपण मंत्र्यांसह आंतरवाली सराटीत येऊ, असेही त्यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनापूर्वी संबंधित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले असून, चार प्रकारच्या प्रमाणपत्रांबाबत आवश्यक निर्देश दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

धाराशिवमध्ये कडकडीत बंद

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. गुरुवारी जिल्हाबंदची हाक देण्यात आली असून व्यापारी संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे.

अनेक ठिकाणी बाजारपेठा आणि दुकाने बंद ठेवण्यात आली. सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे.

परभणीत शाळा-महाविद्यालये बंद

परभणी जिल्ह्यातही बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. यापूर्वी बुधवारी जिल्ह्यातील विविध भागांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. आजचा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्या मागण्यांवर जरांगे ठाम?

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये ज्या भागात कुणबी नोंदी आढळतात, त्या ठिकाणी पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्राच्या पडताळणीची प्रक्रिया सुलभ करणे आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

या मागण्यांवर ठोस निर्णय होण्याची अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेनंतर काही मागण्यांबाबत सकारात्मक संकेत मिळाले असले, तरी अंतिम तोडगा निघालेला नसल्याने आंदोलनाची पुढील दिशा महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यभर आंदोलनाची धग कायम

एकीकडे जरांगे यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे त्यांच्या आंदोलनाला राज्यातील विविध जिल्ह्यांतून पाठिंबा मिळत आहे. बंद, रास्ता रोको आणि विविध आंदोलनांमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.

सरकारकडून देण्यात आलेली आश्वासने प्रत्यक्षात कधी आणि कशी लागू होतात, तसेच जरांगे पाटील उपोषण मागे घेणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT