Manoj Jarange Patil pudhari
जालना

Manoj Jarange Patil: मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लाड भाऊही उपोषणाला बसतील... जरांगेंनी थेट सांगूनच टाकलं

Anirudha Sankpal

manoj jarange patil jalna press briefing: मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून सरकारला दिलेली मुदत संपत आली असतानाच, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारच्या लढाईचा इशारा दिला आहे. "जर आमच्या मागण्यांची मंजुरी झाली नाही, तर १०० टक्के उपोषण होणारच," असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजप नेते प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी सकारात्मकता दाखवत, "मागण्या पूर्ण झाल्या तर उपोषणाची गरजच पडणार नाही," असेही नमूद केले. सरकारने जीआर काढावी ही आग्रही मागणी जरांगे पाटील यांनी केली. कुणबी प्रमाणपत्र देणे सध्या थांबवले असल्याचे देखील निदर्शनास आणून दिलं.

देवेंद्र फडणवीसांचे दूत की मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळ?

प्रसाद लाड यांच्या भेटीवर बोलताना जरांगे म्हणाले, "प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आले आहेत, याचा अर्थ ते मुख्यमंत्र्यांचेच शिष्टमंडळ आहे. शिष्टमंडळ १०० जणांचे असो की एकाचे, प्रश्न मार्गी लागणे महत्त्वाचे असते. ते यातून योग्य मार्ग काढतील अशी आम्हाला आशा आहे. आमच्याकडून पूर्णपणे सकारात्मकता आहे, कारण आम्हाला गरिबांचे कल्याण करायचे आहे." सरकारवर भरोसा नसला तरी लाड यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत त्यांनी टोला लगावला, "लाड भाऊंमुळे वाटते की उपोषणाची वेळ येणार नाही. जर वेळ आलीच, तर लाड भाऊ पण उपोषणाला बसतील, आम्ही बाज टाकून शेजारी-शेजारी बसू."

८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली

यावेळी जरांगे पाटील यांनी सरकार आणि विशेषतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला. "८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. विखे पाटील यांना मी याबाबत वारंवार सांगितले आहे. महामंडळाचे परतावे मिळत नाहीत. तुम्ही फक्त दाखवायला कागदपत्रे आणता, हे म्हणजे फक्त शेंगा हाणण्याचे (फसवण्याचे) काम सुरू आहे," असा घणाघात त्यांनी केला. तसेच, सरकारने बंजारा समाजाच्या आरक्षणाचाही बट्ट्याबोळ करून टाकल्याचा आरोप त्यांनी केला.

'मी पैशाने किंवा पदाने फुटणारा माणूस नाही'

आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना जरांगे भावूक आणि आक्रमक झालेले पाहायला मिळाले. "मी पैशाने किंवा पदाने फुटत नाही. एकाने तरी सिद्ध करून दाखवावे की मी पैसे घेतले आहेत, मी उद्याच फाशी घेईन. माझी लेकरे कुठे आहेत, हेही आज मला माहिती नाही," असे ते म्हणाले. आंदोलनातील भाषेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही जे बोलतो ती खेड्यातील भाषा आहे, त्या शिव्या नाहीत. उपोषणाच्या काळात काही शब्द निघतात, त्यापलीकडे माझे इतर शब्द दाखवावेत."

७५ वर्षांतील बलाढ्य भाजप संपली!

सरकारला थेट आव्हान देताना मनोज जरांगे म्हणाले, "आम्ही अगोदर कुणाला दगड मारले का? आम्ही काहीही धिंगाणा करू शकलो असतो, मात्र मी तो होऊ दिला नाही. अंतरवाली सराटीत पत्र्यातून गोळ्या वर जात होत्या, एवढ्या गोळ्या आमच्यावर मारल्या गेल्या. आता आम्हाला तुमच्याशी भांडायचे आहे, होऊ द्या काय व्हायचे ते! तुम्ही मालक आहात, आम्ही थोडे बोललो तर काय झाले? बोलणे सहन करण्याची थोडी क्षमता ठेवा. ७५ वर्षांतील बलाढ्य भाजप आता संपली आहे." मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "मुख्यमंत्र्यांनी काहीच दिले नाही असे आम्ही नाकारत नाही, गेल्या आठ महिन्यांत मी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोललेलो नाही."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT