वडीगोद्री (जि.जालना) : छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या नावावर सगळे खाल्ले, महाराष्ट्र सदनही सोडले नाही, त्यांना राजकीय पोळी भाजायची असेल आणि पुतण्याला खासदार करायचे असेल. त्यांना उतरती कळा लागली असून एखाद्यावर जळण्याची वृत्ती कोणाचीही नसावी, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीकास्त्र केले.
जात पडताळणी समितीवर कोणी दबाव आणू नये, कुणबी प्रमाणपत्रावर खाडाखोड करण्यात आल्याचे विधान भुजबळ यांनी केले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी भुजबळांवर हल्लाबोल केला. या वयात त्यांनी स्वतःचे राजकारण पहावे, पुतण्याला खासदार कसे करता येते ते पाहावे. वेळ पाहून कधी महाविकास आघाडीमध्ये जातात, कधी महायुतीमध्ये जातात, कधी अजितदादांसोबत जातात, असे जरांगे म्हणाले. मराठा समाज मोठा आहे.
एवढ्या मोठ्या समाजाला फक्त 10 टक्के आरक्षण दिलं आहे. ओबीसींची संख्या ही 60 टक्के आहे हे भुजबळांना कुणी सांगितलं? या दोन दिवसांत भुजबळांना काय झाले? म्हातारपणात चांगली भूमिका घेईल वाटले होते, पण यांना आता यांना पोळी भाजायची असेल. पुतण्याला खासदार करायचे असेल. आपण त्यांना आता महत्त्व देणे कमी करावे, असे ते म्हणाले.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे जरांगे यांचे उपोषण शुक्रवारी सातव्या दिवशीही सुरूच राहिले. सरकारच्या शिष्टमंडळाने गुरुवारी भेट घेऊन मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे सांगितले. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान न मानता मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली.
मुंबईला जाण्याचा इशारा
सरकारला तीन वर्षे वेळ दिला आहे. आता यापेक्षा अधिक वेळ देणे शक्य नाही. ११ सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. अन्यथा १२ सप्टेंबर रोजी मराठा समाजाची बैठक घेऊन मुंबईतील आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाईल, असे ते म्हणाले. सातारा-कोल्हापूरसह औंध गॅझेटियर लागू करण्याच्या मागण्यांवर आपण ठाम आहोत. ५८ लाख नोंदींच्या आधारे सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असे ते म्हणाले.