

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सात दिवसांपासून मनोज जरांगे यांचे उपोषण सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सलग तीन दिवस सरकारचे शिष्टमंडळ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत छत्रपती संभाजीनगरात तळ ठाेकून होते. त्यांनी जरांगेंची भेट घेत चर्चाही केली. परंतु, सरकारने घेतलेल्या निर्णयांचा जीआर पाठवावा.
तोपर्यंत दोन दिवस अभ्यासकांसोबत चर्चा करतो, असे म्हणत उपोषण सोडण्यास त्यांनी शुक्रवारी (दि. ४) सकाळी नकार दिल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. त्यामुळे कोंडी फोडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने अखेर शुक्रवारी दुपारी सरकारचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे उपोषण आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सरकारने मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सांमत आणि आमदार प्रसाद लाड यांना पाठविले. हे शिष्टमंडळ मागील चार दिवसांपासून संभाजीनगरच्या जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये तळ ठोकून होते.