Naldurg Fort incident : एकाच चितेवर आईसह दोन लेकरांना अखेरचा निरोप...

माहेरी व्‍हंताळ येथे झाले अंत्‍यसंस्‍कार ; गाव सुन्‍न; एकही चूल पेटली नाही
Naldurg Fort incident
मृत अश्विनी मोहिते आणि अजिंक्य मोहिते pudhari photo
Published on
Updated on

उमरगा : तालुक्यातील व्हंताळ माहेर असलेल्या मेट्रो रेल्वे विभागातील माजी कर्मचारी तथा राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी तानाजी मोहिते (विवाहानंतरचे नाव अश्विनी मनोहर पोळ (वय ३०) यांनी गुरुवारी, आपल्या तीन लहान मुलांसह नळदुर्ग (ता तुळजापूर) किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.

या घटनेत अश्विनी, त्यांचा साडे पाच वर्षांचा मुलगा अजिंक्य आणि अडीच वर्षांची जुळी मुलगी क्रांती यांचा मृत्यू झाला. दुसरी जुळी मुलगी वीरा गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शुक्रवारी, (दि ०४) अश्विनी व त्यांच्या दोन्ही लेकरांवर माहेर असलेल्या व्हंताळ (ता उमरगा) येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Naldurg Fort incident
Manoj Jarange hunger strike : चर्चा फिसकटल्याने शिष्टमंडळ मुंबईकडे

तालुक्यातील व्हंताळ परिसरात अश्विनी आणि मुलाच्या मृत्यूची घटना गुरुवारी समजताच संपूर्ण गावात एकही चूल पेटली नाही. प्रत्येक घरात अश्रू आणि हळहळ होती. गावातील प्रत्येक जण या दुःखद घटनेने सुन्न झाला होता. शुक्रवारी दुपारी व्हंताळ येथे वाहनातून तिन्ही मृतदेह आणण्यात आले. वाहनातून सर्वप्रथम चिमुकल्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, तो क्षण पाहताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. आईच्या कुशीत खेळण्याच्या वयातील चिमुकले अशा अवस्थेत पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर अश्विनी मृतदेह बाहेर काढण्यात आला.

आश्विनी मोहिते राष्ट्रीय कुस्‍तीपटू

अश्विनी या उत्कृष्ट राष्ट्रीय कुस्तीपटू होत्या. त्यांनी कारकीर्दीत पाच सुवर्ण व सहा रौप्यपदके पटकावली होती. त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कुस्तीपटू असून त्यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखले जात होते. मात्र, या घटनेने एका कुस्तीपटू आईसह तिच्या दोन चिमुकल्यांचा झालेला अंत संपूर्ण परिसराच्या मनावर कायमची जखम करून गेला आहे.

Naldurg Fort incident
India Europe FTA: भारत-युरोप एफटीएच्या यशात महाराष्ट्राची प्रमुख भूमिका:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अनेकांना हुंदका आनावर

आईसह दोन लेकरांचे निष्प्राण देह पाहून संपूर्ण वातावरण अक्षरशः काळवंडून गेले. दुपारी साडेतीनच्या सुमारास अश्विनी आणि त्यांच्या दोन्ही लेकरांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. चितेला भाऊ सुर्याजी मोहीते यांनी मुखाग्नी दिला. आईच्या कुशीत वाढलेली दोन लेकरं आणि त्यांची आई एकाच चितेवर विसावल्याचे दृश्य पाहून उपस्थितांचा बांध फुटला. ‘आई गेली... लेकरंही गेली’ या हृदयद्रावक वास्तवाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रूंचा पूर आला.

logo
Pudhari News
pudhari.news