Leaders from all parties recalled memories of Ajit Pawar
अंबड, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अंबड येथील महात्मा फुले चौकात शुक्रवार (३०) रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या.
भाजपाचे (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष तथा आ. नारायण कुचे, माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र तौर, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, नगरसेवक केदार कुलकर्णी, युवा नेते विनायक चोथे, अॅड. अफरोज पठाण, प्राचार्य भागवत कटारे, जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात, रासपाचे अशोक लांडे यांची यावेळी उपस्थीती होती.
यावेळी बोलताना आ. नारायण कुचे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली वाहताना सांगितले की, अजित पवार हे मी असेल अथवा नसेल मात्र कार्यातून दिसेल असे सांगत. त्यांनी सर्वसामांन्यासाठी निरपेक्ष भावनेने काम केले. त्यांच्या जाण्याने राजकारणात कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, अजित पवार यांनी आमच्या पिढीला घडवून चांगले संस्कार दिले आहे. आपला मोठा भाऊ गमावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. स्वच्छता, नीटनेटकेपणा, व्यसनमुक्त राहणे, कामाचा उरक, सूक्ष्म निरीक्षण, वेळेचे भान असलेला जनमानसाची नाडी ओळखणारा नेता गेल्याचे दुःख होते असेही ते म्हणाले.
राकाँचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी महाराष्ट्राने दिलदार नेतृत्व गमावल्याचे सांगून विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही ! पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही !! या सुरेश भटांच्या काव्याप्रमाणे अजित पवार आजही आपल्यात जिवंत असल्याचे सांगितले.