जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाजीपाल्यामध्ये हिरवी मिरची आणि शेवग्याच्या शेंगांनी भाव खाल्ला आहे. हिरव्या मिरचीला प्रति क्विंटल सरासरी 3000 रुपये, तर शेवग्याला 2500 रुपये दर मिळाला. विशेषतः उन्हाळ्यामुळे लिंबाची मागणी प्रचंड वाढली असून, लिंबाचे दर प्रति क्विंटल 8000 ते 12000 रुपयांच्या घरात पोहोचले आहेत.
फळे आणि भाजीपाल्याची मोठी आवक झाली असून, बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर फळांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून दरामध्येही संमिश्र वातावरण दिसून येत आहे.
बाजार समितीत आज सफरचंदाची 48 कॅरेट आवक झाली असून, याला कमाल 2800 रुपये प्रति कॅरेट असा दर मिळाला. आंब्याचा हंगाम सुरू झाल्याने 109 क्विंटल आंब्याची आवक झाली असून, सरासरी 1600 रुपये दराने व्यवहार झाले. उन्हाळ्याची मागणी लक्षात घेता टरबूज (62 क्विंटल) आणि खरबूज (20 क्विंटल) यांची आवक समाधानकारक राहिली. ड्रॅगन फ्रूट आणि अंजिरालाही ग्राहकांनी चांगली पसंती दिली आहे.
कांदा आणि बटाट्याची आवकही स्थिर असून, कांद्याला 500 रुपये तर बटाट्याला 800 रुपये सरासरी दर मिळाला आहे. एकूणच, फळांची वाढती आवक आणि भाजीपाल्यातील चढ-उतार यामुळे जालना बाजारपेठ सध्या चांगलीच गरम असल्याचे चित्र आहे.
पालेभाज्यांची स्थिती
पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर आणि मेथीची आवक मोठी होती. कोथिंबिरीच्या 1776 जुड्यांची आवक झाली असून, प्रति जुडी सरासरी 300 रुपये (शेकडा प्रमाणे) दर मिळाला. पालक आणि शेपूच्या दरात काहीशी घसरण पाहायला मिळाली, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.