संघपाल वाहूळकर
जालना: जिल्ह्यात स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी मुद्रा याेजनेसह विविध महामंडळाच्यावतीने आर्थिक आधार दिला जात असल्याने स्वयंरोजगाराचा मार्ग सोपा होत आहे. जिल्ह्यातील युवक, महिला तसेच गरजू नागरिकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध शासकीय यंत्रणांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये जिल्हा उद्योग केंद्र, अग्रणी बँक, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ आणि विविध महामंडळांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी मदत मिळाली आहे. सन २०२४-२५ या वर्षाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्हा अग्रणी बँकेच्या मुद्रा योजनेंतर्गत सर्वाधिक लाभार्थी जालना तालुक्यात असून त्यांची संख्या ७२ हजारांहून अधिक आहे. त्यापाठोपाठ अंबड तालुक्यात ८ हजारांहून अधिक, तर भोकरदन तालुक्यात सहा हजारांहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
जिल्ह्यातील जालना तालुका स्वयंरोजगाराच्या योजनांमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येते. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून जालना तालुक्यात १३३ लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अंबडमध्ये ४२, भोकरदनमध्ये ४०, परतूरमध्ये २८, घनसावंगीत २४, बदनापूरमध्ये २३, मंठा येथे २०, तर जाफराबादमध्ये १७ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळासह विविध महामंडळांच्या माध्यमातूनही लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यात आला आहे. खादी ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मदत करण्यात आली असून, विविध महामंडळांच्या योजनांमधूनही मोठ्या संख्येने नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यातून जिल्हाभरातील लाभार्थी स्वतःचा व्यवसाय करीत आहे.
आर्थिक पाठबळ
शासकीय कर्ज, अनुदान आणि विविध आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांमुळे पारंपरिक रोजगारावर अवलंबून असलेल्या नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळत आहे. छोट्या उद्योगांपासून सेवा क्षेत्रातील व्यवसायांपर्यंत विविध उपक्रमांना या योजनांमधून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.