Jalna Red alert issued for the district; panic among citizens over rain
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना जिल्ह्यात शनिवारी मुंबई येथील कुलाबा वेधशाळेने पावसासाठी रेड अलर्ट दिल्यानंतर जिल्ह्यात दिवसभर सर्वदूर भीज पाऊस पडला. या पावसामुळे खरीप पिकाना फायदा होणार असला तरी काही भागांत पडत असलेल्या सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत. शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावास साडेपंधरा फूट पाणी आले आहे.
जालना जिल्ह्यात १ जून ते १६ ऑगस्ट दरम्यान ४५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. वार्षीक सरासरीच्या हा पाऊस ६९ टक्के आहे. जिल्ह्यात परतूर, मंठा व घनसावंगी तालुक्यातील काही भागांत यापूर्वी पडलेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे व तलावांना चांगले पाणी आले आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील अनेक भागात रिमझिम पावसावर पिके तग धरून असल्याचे चित्र आहे. परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे आष्टी-परतूर मार्गावरील नदीला पूर आल्याने हा मार्ग काही काळ बंद झाला होता. अंबड तालुक्यातील शहागड येथे गोदावरी नदी पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसत आहे.
जिल्ह्याला मिळालेल्या रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदी काठावरील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुलाबा वेधशाळेने ढगफुटीसदृश पाऊस होण्याची शक्यता वर्तविल्याने काळजी जिल्हावासीयांची काळजी वाढली आहे. शहरातील बसस्थानकाजवळून वाहणारी सिना नदी यावर्षी प्रथमच पावसामुळे दुथडी भरून वाहताना दिसून आली.
सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अनेक ठिकाणी सोयाबीन व कापसावर किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे पहावयास मिळत आहे. घनसांवगी, अंबड, बदनापूर, भोकरदन, जाफराबाद, परतूर व मंठ तालुक्यात सर्वत्र हलका ते मध्यम् स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली.
२३ फूट क्षमता
her जालना शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावातील पाणी पातळी साडेपंधरा फूट झाली असून २३ फूट क्षमतेचा हा तलाव लवकरच भरणार आहे. घाणेवाडी तलाव ओसंडून वाहिल्यानंतर शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर येणार आहे.