Jalna News : अपूर्ण कामे, खड्डे, अस्वच्छतेवरून विरोधक आक्रमक file photo
जालना

Jalna News : अपूर्ण कामे, खड्डे, अस्वच्छतेवरून विरोधक आक्रमक

नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कारवाईची मागणी, आयुक्तांना निवेदन सादर

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Opposition goes on the offensive over incomplete works, potholes, and lack of cleanliness

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महानगरपालिकेच्या हद्दीतील अपूर्ण विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाईचा अभाव, अस्वच्छता आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षनेते कमलेश खरे यांनी आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे केली आहे. नागरिकांच्या समस्या न सोडवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषण व रास्ता रोको करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचा धोका वाढला असून, पाणीपुरवठा व सांडपाणी योजनांसाठी खोदलेले रस्ते पुन्हा व्यवस्थित न केल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी उघडे मॅनहोल नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत असल्याने ते तातडीने बंद करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

महापौर श्रीमती वंदना मगरे यांनी चार महिन्यांत एकही सर्वसाधारण सभा न घेतल्याचा आरोप करत प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे खरे यांनी म्हटले. तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या केवळ अंतर्गत बदल्या करून कारवाईचा देखावा केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अपात्र स्वच्छता निरीक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून पात्र उमेदवारांची नियुक्ती करावी, पाणीपुरवठ्याचे निश्चित वेळापत्रक जाहीर करावे आणि प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेविका दर्शना झोल (खोतकर), उषा पांगारकर, पूजा दिनेश भगत, सत्यभामा जाधव, पूजा योगेश भगत तसेच नगरसेवक दीपक राठोड, निखील पगारे, दुर्गेश कठोठीवाले, अमोल ठाकूर, अब्दुल सगीर शेख, संजय डुकरे आणि अश्विन अंबेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावरुन महानगर पालिकेत विरोधी पक्षाचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

नालेसफाईचा दावा फोल पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेने केला असला, तरी शहरातील अनेक नाले अद्याप गाळ व कचऱ्याने तुंबलेले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पावसाचे पाणी साचत असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. नालेसफाईवर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा दावा असताना पहिल्याच पावसात शहर जलमय झाल्याने निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- कमलेश खरे, विरोधी पक्ष नेता, महापालिका जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT