जालना ः जालना शहरातील नूतन वसाहत परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुंडांविरोधात कदीम जालना पोलिसांनी गुरुवारी (दि. 2) सायंकाळी धडाकेबाज कारवाई करत भर रस्त्यावरून त्यांची धिंड काढली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आठ दिवसांपूर्वी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष शेख इब्राहिम यांच्यावर जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत मुख्य आरोपी मुन्ना बशीर खान व बबलू बशीर खान यांना अटक केली.
अटकेनंतर पोलिसांनी या दोन्ही आरोपींना नूतन वसाहत परिसरातून भर रस्त्यवरून फिरवले. ज्या भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती, त्याच रस्त्यावर त्यांना हातांता बेड्या घालून फिरवण्यात आले. यावेळी आरोपींनी “आम्ही गुन्हेगार आहोत” अशी कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.