पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील हिसोडा गावाला कित्येक महिन्यापासून लाईनमनच नाही. गावात विद्युत तारांच्या देखभाल दुरुस्तीअभावी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यावरील विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकल्या आहेत. मात्र महावितरण या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे पाहुणे ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वतः फांद्या तोडल्या आहे.
गावात ठिकठिकाणी वीजपुरवठा करणाऱ्या विद्युततारा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या आहे. त्यामुळे जोराचा वारा अथवा पाऊस आल्यास या विद्युत तारांच्या घर्षणातून शॉर्टसर्किट होऊन परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मात्र विद्युत विभागाकडून फांद्या छाटल्या जात नसल्याने अनेक ठिकाणी विद्युततारा झाडांच्या फाद्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत आहेत.
एकीकडे मान्सूनपूर्व उपाययोजना म्हणून अशाप्रकारे विद्युततारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या अशास्त्रीय पद्धतीने छाटल्या जात आहे. त्यामुळे झाड एक बाजूने झुकल्याने पाऊस अथवा हवेने उन्मळून पडण्याचा धोका निर्माण होत आहे, तर दुसरीकडे झाडांच्या फांद्या विद्युत खांबांच्या उंचीवर असलेल्या तारांच्याही वर वाढल्याने वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार होत असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष होताना आहे.
हिसोडा गावासाठी नेमणुकीस असलेला लाईनमन गेल्यापासून अनेक महिन्यांपासून लाईनमन मिळालेला नाही. त्यामुळे विजेच्या तारांना घासणाऱ्या फांद्यांमुळे वारंवार शॉर्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. शिवाय अपघाताचा धोकाही वाढला आहे.नाईलाजाने गावातील तरुणांनीच घरांच्या छतावर चढून फांद्या छाटण्याचे काम हाती घेतले आहे.
कुठलेही सुरक्षा साधन नसताना, जीव धोक्यात घालून हे काम करावे लागत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. ‘लाईनमनसाठी महावितरणकडे अनेकदा तक्रारी केल्या, पण दुर्लक्ष केले जात आहे. उद्या काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे महावितरणने तातडीने हिसोडा येथे कायमस्वरूपी लाईनमनची नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामस्थांनी वीज तारा प्रवाह करणाऱ्यांमध्ये झाडाच्या फांद्याची छाटणी केली आहे. याबाबत कुठल्याही प्रकारची सुरक्षा नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असावा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यामुळे लाईनमन न मिळाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.रामेश्वर जगताप, ग्रामस्थ