

पारध ः भोकरदन तालुक्यातील पारध गावची 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या या गावाची ग्रामपंचायत तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक मानली जाते. ग्रामपंचायतीत 15 सदस्यांची बॉडी असून गावाच्या विकासासाठी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मात्र सध्या गावात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गावातील नाल्या तुंबल्या, सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून तातडीने तुंबलेल्या नाल्याची सफाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या प्रशासनाचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. मात्र गावातील स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. गावातील अनेक भागांत नाल्या तुंबून सांडपाणी रस्त्यावर वाहत असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पारध गावातील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून ग्रामपंचायत सरपंच व प्रशासक या दोघांनीही याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. गावातील तुंबलेल्या नाल्या, साचलेली घाण आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिक वारंवार तक्रारी करत असताना केवळ आश्वासने देऊन चालणार नाही. प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करून नियमित साफसफाई करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या भावना तीव्र होऊन आंदोलन उभे राहू शकते.
उडवा-उडवीची उत्तरे- बसस्थानक परिसर, मुख्य रस्ते तसेच वॉर्डातील अंतर्गत भागांत मोठ्या प्रमाणात घाण साचलेली दिसून येत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही “पाहतो”, “लोक पाठवतो” अशीच उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
संतोष मोकाशे, नागरिक पारध
गावात आमचे कर्मचारी अहोरात्र साफसफाईचे काम करत आहेत. मात्र स्वच्छता कर्मचारी कमी असल्याने काही ठिकाणची कामे बाकी आहेत.
गजानन उंबरकर, (ग्रामसेवक)
ग्रामसेवकांनी साफसफाई नियमित सुरू असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात गावातील नाल्या तुंबलेल्या आणि घाणीने भरलेल्या दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून गावातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. -
गणेश लोखंडे, माजी सरपंच