Grant of ₹24 Lakhs for an Agricultural Implements Bank
जालना, पुढारी वृत्तसेवा : कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पाच्या वतीने जालना जिल्ह्यातील सुमारे १७७ गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कृषी औजारे बँकसाठी प्रकल्प मुल्याच्या ६० टक्के इतके अनुदान म्हणजेच २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अशी माहिती आत्माचे प्रकल्प संचालक अमोल आगवण यांनी दिली.
दरम्यान, जालना जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि महिला बचत गटांना उभारणी देण्यासाठी अर्थ सहाय्य या योजनेतून उपलब्ध होणार आहे. प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावातील संबंधित गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान १० सदस्य असणे बंधनकारक आहे.
एकाच गावातून एक पेक्षा अनेक अर्ज आले तर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होईल. प्रकल्प रक्कम ही २०लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या गटांना राष्ट्रीयीकृत बँकेकडून किमान ७५ टक्के कर्ज घेणे बंधनकारक असणार आहे.
इच्छुक गटांनी संस्थानी प्रकल्पाच्या अधिकृत पोर्टल वर dashboard.mahapocra.gov. in या पोर्टल वर ५ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन कृषी विभागाच्याव वतीने करण्यात आले आहे.
या औजारांची करता येणार खरेदी
निवड झालेल्या गटाना ट्रॅक्टर चलीत औजारे, बीबीएफ रोपनी व लावणी यंत्र, मलचिंग मशीन, कम्बाइन हार्वेस्टर फवारणी पंप यासारखे यंत्र खरेदी करून शासकीय योजनेचा लाभ घेता येईल.
गाव पातळीवर कृषी 66 औजार बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्प मूल्याच्या ६० टक्के इतके अनुदान म्हणजेच २४ लाख रु पर्यंत अनुदान मिळणार आहे गावातील उमेद गट, माविम गट, यांच्या द्वारे पुरस्कृत महिला बचत गट, तसेच ग्राम संघ पात्र राहतील.-जी. आर. कापसे, कृषी अधीक्षक अधिकारी, जालना.
नानाजी देशमुख टप्पा क्रमांक १ मध्ये आत्मा 66 क्रमांक अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला शेतकरी गटांना संधी होती. मात्र टप्पा क्र. दोन मधे आत्माच्या महिला गटांना वगळले आहे. त्यामुळे या योजनेत त्या गटांनाही प्राधान्य देण्यात यावे.-रवींद्र गोल्डे, पुरस्कार प्राप्त शेतकरी, अंबड.