जालना ः या वर्षी पावसावर अल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्या भागात पाऊस कमी जास्त पडणे, पावसाचा खंड पडणे आणि पावसाचे असमान वितरण होणे, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडल्यानंतर व जमिनीत पुरेशी ओल असतानाच पेरणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञ, अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, पुरेसा पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर येथील सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार यांनी केले आहे.
या परिस्थितीत बियाणे उगवण, फुल व फळ धारणेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे, अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामात पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे, कोरडवाहू शेती करणाऱ्यांनी हलकी पेरणी करावी तसेच भारी मध्यम जमिनीत पेरणी रुंद सरी वरंबा पद्धतीने करणे, उताराला आडवी पेरणी करणे, कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या पिकांची वाणांची निवड करणे. लहरी हवामानात शेतीमधील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीची जलधारणाशक्ती वाढवण्यासाठी मूलस्थानी जलसंधारण शेतामध्ये राबवावेत, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी कृषी विभाग नेहमी तत्पर आहे. खतांचा संतुलित वापर करून, शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे. शिवाय, यंदा अल निनोचा प्रभाव असल्यामुळे जोपर्यंत 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.पी. बी. बनसावडे, कृषी विकास अधिकारी, जि. प. जालना.