Eating pani puri in Jalna proved to be costly Food poisoning
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जालना शहरातील टट्टुपुरा भागात पाणीपुरी खाणे नागरिकांच्या जिवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. येथील एका विक्रेत्याकडे पाणीपुरी खाल्ल्यानंतर १५ ते २० जणांना अचानक अन्नातून विषबाधा झाली.
उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने बाधितांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
शहरातील टट्टपुरा परिसरात सायंकाळी नागरिक नेहमीप्रमाणे पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी जमा झाले होते. मात्र, पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच अनेकांना पोटदुखी, मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचा त्रास जाणवू लागला.
दूषित पाण्यामुळे बाधा झाली?
नागरिकांनी आणि नातेवाईकांनी बाधित रुग्णांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तत्परतेने उपचार सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. प्राथमिक अंदाजानुसार, पाणीपुरीसाठी वापरलेले पाणी दूषित असण्याची किंवा स्टॉलवर अस्वच्छता असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.