Dhanure murder case; Killer arrested within 24 hours
जालना, पुढारी वृत्तसेवा : रविवारी कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला आज वेगळेच वळण आले आहे. सोमवार, दि. २२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून मयत सागर धानुरे यांनी आत्महत्या केली नसून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न केले. त्यांच्या हत्येतील सहभागी आरोपींना पोलिसांनी २४ तासांत जेरबंद केले आहे. अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मंगळवार, दि. २२ रोजी दिली. आरोपींची नावे कल्याण गणपतराव भोजने व कमलेश झाडीवाले अशी आहे.
दरम्यान, प्राप्त परिस्थितीनुसार आणि तपासाअंती ही आत्महत्या नाही हा हत्येचा डाव असल्याचे पोलिसांना प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना केल्या. गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपी कल्याण गणपतराव भोजने, (४१ वर्ष, रा. समर्थ नगर, जुना जालना) याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास राहत्या घरातून ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मयत सागर धानुरे व त्याचे पैशाच्या देवाण-घेव ाणीवरून वाद होते. सागर धानुरे हा याच पैशासाठी त्रास देत असल्याचे भोजणे याने पोलिसांना सांगितले. या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी कमलेश झाडीवाले व सागर धानुरे यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा घेऊन कमलेश झाडीवाले यास सागर धानुरे यास ठार मारण्यासाठी २५ लाख रुपये देण्याचे कबुल केले.
१५ दिवसांपूर्वी कट रचला असल्याचे त्याने सांगितले. आरोपी कलमेश झाडीवाले याचा शोध घेणेकामी पथक छत्र पती संभाजीनगर येथे रवाना केल्यानंतर तो जालन्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पथकाला मिळाल्याने त्यास नागेवाडी टोलनाक्याजवळ अडवून त्यास ताब्यात घेतले व त्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. व त्याला आरोपी कल्याण भोजने हा सागर धानुरे यास जिवे मारल्यानंतर २५ लाख रुपये देणार होता अशी कबुली दिली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ व सोबत स्थागुशाचे अंमलदार रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इर्शाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे, संजय सोनवणे यांनी केली आहे.