जालना : सुहास कुलकर्णी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार असल्याने या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेषतः भाजपच्या संघटनात्मक ताकदीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा जालना जिल्ह्याच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रेशीम बाजारपेठ तसेच प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या दौऱ्यात विकासकामांच्या उद्घाटनांसोबतच भाजपच्या आगामी राजकीय वाटचालीचेही संकेत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण कुचे तसेच जालना शहर महापालिका जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या स्तरावर बैठका सुरू आहेत. कार्यक्रम नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लागली आहे.
दरम्यान, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे राहुल लोणीकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील आणखी एका महत्त्वाच्या संस्थेवर भाजपची पकड निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, या दौऱ्यातून जिल्ह्यातील भाजपची संघटनात्मक ताकद आणि आगामी राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.