Chief Minister's Samrudd Panchayat Raj Abhiyan; Work to be done till 31st December
जालना, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ग्रामविकासाला नवा वेग देण्यासाठी शासनाने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' राबवण्यास सुरूवात केली असून, या अभियानात जालना जिल्ह्यातील तब्बल १६० गावे सहभाग नोंदवून स्पर्धेला सज्ज झाली आहेत. ग्रामपंचायतींच्या कार्यक्षमतेचा सर्वांगीण आढावा घेऊन शाश्वत विकासाला चालना देणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
या स्पर्धेत प्रत्येक गावाला १०० गुणांचा पेपर सोडवायचा असून, स्वच्छता, पाणीव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, ग्रामविकास योजना, पर्यावरण संवर्धन, डिजिटल सेवा, सामाजिक उपक्रम, महिला-बालक विकास आणि आर्थिक शिस्त अशा विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यमापन होणार आहे. या चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना लाखो रुपयांच्या प्रोत्साहनपर बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.
अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू पी एम. यांनी विभागीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान, त्यांनी विशेष मोहिम राबवून गावातून अभियानाची जनजागृती प्रभातफेरीच्या माध्यमातून केली गेली. श्रमदानातून वनराई बंधारे, प्लास्टीक मुक्ती, वृक्षलागवड, स्वच्छता आदींसह ड्रेनेज दुरुस्ती, शाळा-सुविधा उभारणी आणि पाणीपुरवठा सुधारणा अशा उपक्रमांना गती दिली आहे.
या अभियानातंर्गत स्वच्छता, हरित विकास आणि लोकसहभागावर भर प्लास्टिकमुक्त गाव निर्मिती, वृक्षारोपण, महिलांच्या बचतगट व कारागिरांच्या वस्तूंचे प्रदर्शन-विक्री, सौर व एलईडी दिव्यांच्या वापरास प्रोत्साहन, महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आणि पोषण जनजागृती अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. या अभियानासाठी पंचायत समितीस्तरावर देखील पुरस्काराची तरतूद करण्यात आली आहे.
विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार रु १ कोटी, द्वितीय पुरस्कार रु ७५ लक्ष, तृतीय पुरस्कार रु ६० लक्ष तर राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार रु २ कोटी, द्वितीय पुरस्कार रु १.५ कोटी, तृतीय पुरस्कार रु १.२५ कोटी असणार आहे. जिल्हा परिषदेला देखील राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार रु ५ कोटी द्वितीय पुरस्कार रु ३ कोटी, तृतीय पुरस्कार रु २ कोटीचे बक्षिस असणार आहे.
विविध स्तरावरील पुरस्काराचे स्वरुप
तालुकास्तरावर : प्रथम पुरस्कार रु १५ लक्ष, द्वितीय पुरस्कार रु १२ लक्ष, तृतीय पुरस्कार रु ८ लक्ष तर दोन ग्राम पंचायतींना विशेष पुरस्कार प्रत्येकी रु ५
लक्ष रुपयांचा असणार आहे जिल्हास्तरावर : प्रथम पुरस्कार रु ५० लक्ष, द्वितीय पुरस्कार रु ३० लक्ष
तृतीय पुरस्कार रु २० लक्ष विभाग स्तरावर प्रथम पुरस्कार रु १ कोटी,
द्वितीय पुरस्कार रु ८० लक्ष, तृतीय पुरस्कार रु ६० लक्ष.
राज्य स्तरावर : प्रथम पुरस्कार रु ५ कोटी, द्वितीय पुरस्कार रु ३ कोटी, तृतीय पुरस्कार रु २ कोटी
हे आहेत मूल्यांकनांचे घटक (१०० गुण)
सुशासनयुक्त प्रशासन, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका व सामाजिक न्याय, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम.
स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम बनवण्याचे ध्येय ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षमतेला प्रोत्साहन देणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे, लोकसहभाग वाढविणे तसेच आरोग्य, शिक्षण, उपजीविका आणि सामाजिक न्याय या क्षेत्रांत सर्वांगीण प्रगती साधणे हे आहे.मिनू पीएम., सिईओ, जि. प. जालना