भोकरदन : पावसाने मारलेल्या दांडीमुळे खरीप हंगामातील पिकांना पाण्याचा गरज भासत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत पावसाची शक्यता धूसर असल्याने शेती पिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे.
पावसाच्या या खंडामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीत जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांना वाचवण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना तातडीने पुढील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या काळात रासायनिक खते देणे पूर्णपणे बंद करावे. शक्य असल्यास तुषार किंवा ठिबक सिंचनाद्वारे पिकांना तत्काळ संरक्षण पाणी द्यावे. जमिनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतात कोळपणी करावी. पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी २% पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) ची फवारणी करावी.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी सूचना देण्यात येत आहे. पावसाच्या खंडाने निर्माण झालेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनाचे पालन केल्यास त्यांच्या उत्पादन वाढीस मदत होईल.गजानन दळवी, सहायक कृषी अधिकारी, भोकरदन