आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वासह परिसरात दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. पावसाअभावी मक्याची वाढ खुंटून पीक चाऱ्यासारखे झाले असून सोयाबीनचीही अवस्था पालापाचोळासारखी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठे संकट आले आहे.
यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झालेला नाही. अल्पशा पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या. मध्यंतरी अधूनमधून हलक्या सरी कोसळल्याने पिकांनी कशीबशी तग धरली. मात्र, पिके ऐन फुलोऱ्यात आली आणि शेंगा लागण्यास सुरुवात झाली असतानाच पावसाने पुन्हा उघडीप दिली.
परिणामी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी झाला. मकाचे कणसे व फुले व शेंगा करपून गेल्याने सोयाबीनच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. सध्या परिसरात मे महिन्यातील उन्हाळ्यासारखा कडक उन्हाळा जाणवत आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असून जमिनी अक्षरशः तापून निघाल्या आहेत.
पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी गावोगावी धोंडी काढणे, देवदेवतांना साकडे घालणे असे पारंपरिक उपायही सुरू झाले आहेत. मात्र, अद्याप वरुणराजाची कृपा झालेली नाही. पावसाने दडी मारल्याने विहिरी व बोअरवेलची पाणीही झपाट्याने खालावत आहे. पावसाचा आणखी खंड पडल्यास पाण्याची समस्या निर्माण होईल.
जवळपास दीड महिना पावसाने खंड दिल्याने मका, सोयाबीन, कापसासह इतर प्रमुख खरीप पिके वाळून चालली आहेत. जमिनीला भेगा पडल्या आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल.दौलत सिरसाठ, शेतकरी
पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. वाढत्या तापमानामुळे पिके करपत चालली आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच पाण्याअभावी सोयाबीनची फुले व शेंगा गळून पडून असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.गणेश गव्हाणे, शेतकरी