आन्वा : भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील आठ-दहा वर्षांपासून निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागत आहे. कधी पावसाअभावी, तर कधी अतिवृष्टीमुळे खरीप पेरणी लांबते किंवा होतच नाही. काहीवेळा वेळेवर पाऊस पडून पिके बहरात येतात आणि यंदा भरघोस उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा निर्माण होते; मात्र ऐन हंगामात अतिवृष्टी किंवा रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आ-लेला घास निसर्ग हिरावून घेत आहेत.
तालुक्यातील आन्वासह परिसरात आठवडाभरापासून ढगाळ हवामानामुळे रब्बी हंगामातील हरभरा व गहू पिकाच्या सोंगणीला वेग आला असून परिसरातील शेतकरी संभाव्य अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतात सकाळपासूनच लगबगीने काम करतानाचे चित्र दिसून येत आहे. यंदा हरभरा व गहू पिकाची समाधानकारक स्थिती असून परिसरात अशी हरभरा सोंगणीची कामे सुरू आहेत.
हरभऱ्याचे गाठे सुकण्याच्या टप्प्यात असून, गव्हाच्या ओंब्यात दाणे भरले आहेत. अचानक बदललेले हवामान, ढगाळ मात्र, वातावरण व थंड वाऱ्यामुळे पिकांवर ओलसरपणाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत अवकाळी पाऊस झाल्यास उत्पादनात घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी सतर्क झाले आहेत.
अवकाळी पावसाच्या धास्तीने शेतकरी शेतकऱ्यांनी वाढीव मजुरी देऊन गह व हरभऱ्याची काढणी वेगात सुरू केली आहे. अवकाळी पाऊस पडल्यास धान्याची गुणवत्ता घसरण्याची शक्यता असून भिजलेल्या शेतीमालाला बाज-ारात योग्य भाव मिळणार नाही. त्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही घटण्याची भीती व्यक्त होत आहे. गारपीट झाल्यास संपूर्ण पीक हातचे जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
हरभऱ्याची सोंगणी सुरू
अनेक शेतकऱ्यांनी मजूर लावून सोंगणीची कामे वेगात सुरू केली आहे. कापणी केलेल्याची शेतात गंजी लावली असून शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्यावर भर दिला आहे.