Ashok Naigaonkar sad, while Meenakshi Patil is declared the Na. Dhon. Mahanor Award
जालना, पुढारी वृत्तसेवा: येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्यकाव्य पुरस्कार ठाणे येथील प्रसिद्ध विनोदी कवी अशोक नायगावकर यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे यंदा २८ वे वर्ष असून २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच ना. धों. महानोर राज्य पुरस्कार कवयित्री तथा ललित लेखिका मौनाक्षी पाटील (मुंबई) यांना घोषित झाला आहे. १० हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या गुढीपाडव्यास गुरुवारी (ता. १९) सायं. ७.०० वा. जालना येथे कवितेचा पाडवा या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कवितेचा पाडवाचे संयोजक अभय साहनी, विनीत साहनी, लेखिका, कवयित्री डॉ. संजीवनी तडेगांवकर, अनुभव प्रतिष्ठान चे सचिव पंडितराव तडेगांवकर यांनी रविवारी ( ता. ०८) रोजी पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्यमैफल रंगणार आहे.
रसिकांनी गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभघ्यावा, असे आवाहन संयोजकातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान यापूर्वी बलवंत धोंगडे, वृषाली किन्हाळकर, कैलास भाले, फ. मु. शिंदे, स्व. भगवान देशमुख, रामदास फुटाणे, इंद्रजीत भालेराव, निरजा, मनोज बोरगावकर लोकनाथ यशवंत, विष्णू सूर्या वाघ, राजन गवस, प्रज्ञा दया पवार, अरुणा ढेरे, रेखा बैजल, दासू वैद्य आदी दिग्गज कवी, साहित्यिकांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
विपुल काव्य, साहित्य संपदा !
विनोदी कवी अशोक नायगावकर यांचे वाटेवरच्या कविता-१९९२ आणि कवितेच्या वाटेवर २०२२ कवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कवितांचे सादरीकरण केले असून कवितेची नायगावकरी विनोदी शैली प्रसिद्ध आहे. कवी, चित्रकार, ललित लेखिका मीनाक्षी पाटील यांचे "इज इट इन युअर डीएनए कवितासंग्रह उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता (समीक्षा ग्रंथ) "खानदेशी म्हणी व वाक्प्रचार : एक लोकाभ्यास" आणि "साधन डायरी" हे अनुवादित ग्रंथ प्रकाशित आहेत.