Inflation hits the common man!
खदीर अहेमद
वसमत : दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. खाद्यतेल, तांदूळ, डाळी, साखर, दूध, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सामान्य कुटुंबांचे जगणे अधिकच कठीण बनले आहे.
महागाईचा फटका प्रत्येक घराला बसत असतानाही याबाबत अपेक्षित प्रमाणात चर्चा होत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. सध्या खाद्यतेलाचे दर जवळपास १२० रुपये किलो, तांदळाचे दर ७० रुपयांपेक्षा अधिक, विविध डाळींचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. साखरेचे दर शंभरीच्या दिशेने वाटचाल करत असून दूध ९० ते १०० रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे.
भाजीपाल्याचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने घरगुती अर्थसंकल्पाचे तीन तेरा वाजले आहेत. महागाईचा खरा परिणाम एका सामान्य कुटुंबाच्या रोजच्या खर्चातून दिसून येतो. दिवसाला सुमारे ५०० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीचे गणित पाहिले तर एकूण ३६५ रुपयांचा खर्च होतो.
यानंतर त्या व्यक्तीच्या हातात केवळ १३५ रुपये उरतात. या उरलेल्या रकमेत मुलांचे शालेय शिक्षण, ऑटो किंवा बसचे भाडे, घरभाडे, वीजबिल, दवाखान्याचा खर्च, प्रवास, सामाजिक जबाबदाऱ्या तसेच आकस्मिक गरजा भागवणे जवळपास अशक्य झाले आहे. दोन मुलांचे कुटुंब असेल तर परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र आहे.
महागाईच्या या झळा सर्वसामान्य नागरिकांना दररोज सोसाव्या लागत असताना, स्वस्त काय राहिले? हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
काही महिन्यांपूर्वी ३ हजारात येणारा महिण्याचा किराणा सरळ ५ ते ६ हजारावर येऊन ठेपला तरीही तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे. फुकटचे ५ किलो रेशन आणि महिलांचे दीड हजार घेऊन खूश होणारे दुसरीकडे दिवाळे निघाले तरी चालतील पण तोंडातून ब्र निघाले नाही पाहिजे अशीच गत झाली असल्याचे चित्र सद्या आहे.
५०० रूपये कमविणाऱ्या माणसाला दररोज दूध ५० रूपये, साखर, चहा पत्ती ४० रूपये, भाजीपाला ५० रूपये, खाद्यतेल २५ रूपये, गहू-ज्वारी ५० रूपये, डाळी २५ रूपये, तांदूळ ५० रूपये, गॅस/इंधन २५ रूपये, दुचाकी तेल ५० रूपये असा एकुण ३६५ रूपये खर्च होत असून १३५ रूपये उरत असल्याचे चित्र आहे. याच पैशांत शाळेची फी, घरभाडे, वीजबिल, दवाखाना, प्रवास आणि इतर खर्चाचा बोजाही सर्वसामान्यांवर पडत असल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे.