hingoli agriculture news
पांगरी, पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील वाई परिसरात सध्या हरभरा काढणीला वेग आल्याचे दिसत आहे. महाशिवरात्री झाल्यावर रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके काढणी योग्य होत असल्यामुळे महाशिवरात्रीनंतर शेतकरी पीक काढणीस सुरुवात करतात.
पीक काढणीचा हंगाम महाशिवर ात्री पासुन जवळपास गुढीपाडव्यापर्यंत चालू राहातो. शेतकरी वर्षभरात लागणारे धान्य घरात आणून टाकतो. शेतकऱ्यांचे नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरुवात होते. महाशिवरात्रीपासून ते गुढीपाडवा दरम्यान नवीन पीक कापणी करून धान्य तयार करणे, धान्य घरी नेऊन टाकणे, ज्वारीचा कडबा व्यवस्थीत वळई लावणे, भूस जनावरांसाठी साठवून ठेवण्याची कामे चालू असतात.
सध्या हरभरा काढणीला वेग आल्याचे चित्र दिसत आहे. आगामी काही दिवसात गहू, ज्वारीच्या कापणीला सुरुवात होणार आहे. गहू यंत्राच्या साह्याने काढणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसत आहे. ज्वारी काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने ज्वारीचा पेरा कमी प्रमाणात दिसून येत आहे.
खरीप पीक जास्त पाऊस झाल्याने हातचे गेले. त्यामुळे शेतकरी आता रब्बी हंगामातील पिकावर पुढील वर्षीचा शेती खर्च, घरखर्च भागवणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पुढच्या हंगामासाठी कसरत
कर्ज माफी झाली आणि नवीन कर्ज जर परत शेतकऱ्यांना मिळाली तर पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. आजही कर्ज माफीचा प्रश्न अनभिज्ञ आहे. कर्ज माफी नेमकी कोणत्या महिन्यात होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे पुढचे वर्ष शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकाच्या लागवडीसाठी जेमतेम खर्च तसेच घर खर्च करण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.