

प्रल्हाद चव्हाण
आडगाव रंजे : वसमत तालुक्यात आडगाव रंजे परिसरात सोमवारी (दि.२३) दुपारी साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. यामध्ये हरभरा ,गहू, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले. व शेतकरी पुन्हा एका संकटात सापडला.
परिसरात सोमवारी दुपारपासून अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढगांची गर्दी व्हायला सुरुवात झाली. याच दरम्यान सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामध्ये उभे असलेल्या गहू ज्वारी हरभरा ही पिके अक्षरशा भुई सपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गत दोन-तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांची ज्या पिकाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले, तेच एक क्षणात अक्षरशा भुई सपाट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पानावले होते.
खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर होऊनही अद्यापही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्याची अद्यापही प्रतिक्षाच आहे. त्यातच रब्बी हंगामातील पिकांचीही ही अवस्था पाहून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागेल. झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई व खरिपाचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.