हिंगोली : जिल्ह्यात नव्याने स्थापन केल्या जाणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राथमिक निवड यादीत गावातील मूळ रहिवासी नसलेल्यांची निवड झाल्याने मंगळवारी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारींचा पाऊसच सुरू झाला. मंगळवारी सुमारे 50 पेक्षा अधिक गावकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्याने आता ही प्रक्रियाच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात 430 आपले सरकार सेवा केंद्रासाठी 22 डिसेंबर 2025 रोजी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार या केंद्रासाठी जिल्ह्यातून तब्बल 3 हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यानंतर झालेल्या छाननीमध्ये 1861 जण मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात 3 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या.
त्यानंतर सोमवारी प्राथमिकदृष्ट्या निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून प्रसिध्द झालेल्या यादीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या उमेदवारांची नांवे पाहून त्या गावातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांवर डोळे पांढरे करण्याची वेळ आली. गावातील मूळ रहिवासी नसलेल्या उमेदवारांची त्या गावासाठी निवड झाल्याने इच्छुक उमेदवारांतून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
काही ठिकाणी उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ प्रत, डिग्रीच्या मूळ प्रत, या शिवाय रहिवासी प्रमाणपत्र मागविण्यात आले. तर काही जणांनी चक्क भाडेकरारनामा सादर करून आपण त्या गावात किरायाने राहात असल्याचे दाखविले आहे. या प्रकारानंतर आता उमेदवारांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली असून मंगळवारी तब्बल 50 पेक्षा अधिक उमेदवारांनी तक्रारी केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारामुळे आता ही प्रक्रिया वादात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एनआयसी केंद्रात एकदा बदली झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पुन्हा हिंगोलीच्याच कार्यालयात रूजू झालेल्या एका कर्मचाऱ्याची या प्रक्रियेत लुडबुड झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता त्या कर्मचाऱ्याची बदली करण्याची मागणीही केली जात आहे.