Food Adulteration Drive pudhari photo
हिंगोली

Hingoli News : चोर सोडून संन्‍याशाला फाशी

अन्न व औषध प्रशासनाच्‍या कारवाईचा प्रकार, बेरोजगारी वाढली

पुढारी वृत्तसेवा

गिरगाव : अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या अन्न भेसळ विरोधी कारवाईच्या धडाक्यामुळे प्रामाणिक छोटे व्यावसायिक, फेरीवाले आणि किरकोळ उत्पादकांवर उपासमारीची वेळ आली आहे. चुकीच्या आणि संशयास्पद चाचण्यांमुळे तरुण युवकांच्या व्यावसायिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सध्या अन्न भेसळीविरोधात सुरू असलेल्या धडक मोहिमांमुळे छोटे व्यावसायिक आणि किरकोळ खाद्यपदार्थ उत्पादक अत्यंत धास्तावले आहेत. या कारवाईतील त्रुटींमुळे आणि कठोर कायदे प्रक्रियेमुळे प्रामाणिक लोकांवर रोजीरोटी गमावण्याची वेळ येत आहे.अन्न भेसळ कारवाई की गरिबांच्या पोटावर घाला? हा प्रश्न छोट्या व्यवसायिकांकडून केला जात आहे. कारण छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ सध्या सुरू असलेल्या प्रशासनाच्या कारवाईमुळे आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात अन्नातील भेसळ आणि बनावट पदार्थांविरोधात अत्यंत आक्रमक मोहीम राबवली जात आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे पाऊल स्वागतार्ह असले, तरी या मोहिमेच्या नावाखाली सुरू असलेल्या धडक कारवायांचा फटका मात्र गिरगांव परिसरातील अनेक लहान व्यावसायिक, हातगाडीवाले आणि घरगुती उत्पादक गरिबांना बसत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करता व्यवसाय करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात असल्याने छोट्या व्यवसायीकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

मात्र, मोठ्या रॅकेटच्या नादात अनेक छोट्या फेरीवाले, दुग्धजन्य पदार्थ विकणारे आणि किरकोळ खाद्य विक्रेते यात भरडले जात आहेत. मालाच्या साठवणुकीत किरकोळ त्रुटी असणे यांसारख्या कारणांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर तर अनेक लहान व्यावसायिक पिढ्यानपिढ्या किंवा छोट्या भांडवलावर दुग्धजन्य पदार्थ, मसाले, तेल आणि मिठाईचा व्यवसाय करून आपला परिवार चालवतात. अशा कारवायांमध्ये एकतर माल जप्त होतो किंवा दुकाने बंद होतात. यानंतर खटले चालवून निर्दोष सिद्ध होईपर्यंतच्या प्रक्रियेत हे व्यावसायिक पूर्णपणे डबघाईस येऊन रस्त्यावर येतात.

सध्या या कुटुंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडल्याचे हृदयद्रावक चित्र समोर येत आहे. प्रशासनाने मोठ्या गुन्हेगारांवर कारवाई करावी, छोट्या व्यावसायिकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ आणि विक्री संदर्भात कायद्याचे मार्गदर्शन द्यावे, अशी मागणी होत आहे.

  • छोट्या व्यावसायिकांच्या दुकानाच्या फोटो काढून नेणे, नाव, मोबाईल नंबर लिहून घेणे असे प्रकार सुरू असल्याने छोट्या व्यावसायिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले असून व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवत आहेत. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असा आरोप होत आहे. कारवायांचा उद्देश कोणाचाही व्यवसाय बंद करणे नसून सुरक्षित अन्न आणि ग्राहकांचे आरोग्य सुनिश्चित करणे हा आहे असे असले तरी, अनधिकृत उत्पादक आणि प्रामाणिक छोटे व्यावसायिक यांच्यातील सीमारेषा स्पष्ट न झाल्यामुळे गरिबांचे संसार संकटात सापडले आहेत. त्यामुळे या मोहिमेत मानवी दृष्टिकोन बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT