Petrol Diesel Crisis Hingoli
औंढा नागनाथ : तालुक्यातील सुमारे १४ पेट्रोल पंपांवर कृत्रिम इंधन टंचाई निर्माण होत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील इराण, इराक, अमेरिका आदी देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून, यामुळे पंपांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
तेल कंपन्यांकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध होत नसल्याने तसेच वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पंपचालकही मर्यादित इंधन देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाहनांची वाढती संख्या आणि शेतीकामासाठी यंत्रांचा वाढता वापर यामुळे डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
पूर्वी कॅन, पाण्याच्या बाटल्या किंवा टाक्यांमध्ये इंधन दिले जात होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत हे प्रकार बंद करून केवळ वाहनांनाच मर्यादित इंधन दिले जात आहे. केळी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर इंधनावरून वाहनचालक व कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याने पंपचालकांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली. यावर पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे यांनी तक्रार दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून सर्व पंपांवर पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, काही ठिकाणी इंधन उपलब्ध असूनही पंपचालक वाहनचालकांना मर्यादित पुरवठा करत असल्याचेही समोर आले आहे. जिल्हा पुरवठा विभागाने दिलेल्या आदेशांमुळे परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली. २६ तारखेला चारचाकी वाहनांसाठी २ हजार रुपये आणि दुचाकीसाठी २०० रुपयांपर्यंत इंधन मर्यादा घालण्यात आली होती. यामुळे पंपांवर लांबच लांब रांगा लागून गोंधळ निर्माण झाला.
नंतर २७ तारखेला हा आदेश मागे घेऊन कॅन व डब्यात इंधन देण्यास बंदी घालण्यात आली; मात्र, नागरिकांचा वाढता आक्रोश लक्षात घेऊन ही बंदीही हटवण्यात आली. आदेशांमध्ये स्पष्टता नसल्याने पंपचालक आणि वाहनचालक दोघेही संभ्रमात पडले आहेत.
या सर्व प्रकारामुळे शेतीची कामेही प्रभावित झाली असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने परिस्थितीत तातडीने हस्तक्षेप करून कृत्रिम टंचाई रोखावी व सुरळीत इंधन पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.