

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे मंगळवारी (दि. २४) रात्री अज्ञात व्यक्तीने हरभऱ्याच्या ढिगाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत शेतकरी तुषार तातेराव कदम यांचे अंदाजे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार कदम यांनी आपल्या शेतातील हरभरा पीक कापणी करून शेतातच ढिग करून ठेवला होता. या ढिगात सुमारे २८ क्विंटल हरभरा असून त्याची बाजारमूल्य अंदाजे दीड लाख रुपये होते. मात्र, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने या ढिगाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण हरभरा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व वारंगा मदत केंद्राचे जमादार शेख गौसोदिन यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेतील दोषींचा तपास घेऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. दरम्यान, मेहनतीने उभे केलेले पीक अशा प्रकारे जळून गेल्याने शेतकरी कदम यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.