हिंगोली पुढारी वृत्तसेवा : सद्यस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगाम सुरु झालेला आहे. शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणारे बियाणे, खते व औषधे इत्यादीची खरेदी सुरु आहे. जिल्ह्यात बियाणे, खते यांचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे. विशेषत: कापूस पिकाबाबतीत शेतकऱ्यांचा कल बीटीजीन असलेल्या वाणाची पेरणी करण्याकडे आहे. शासनाने तुलसी कंपनीचे बीटी कापूस वाण, कबडडी, पंगा, राशी कंपनीचे राशी ६५९ तसेच इतर सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या बीजी-२ कापूस बियाण्याच्या पाकिटाची कमाल किरकोळ विक्री किंमत ८५३ रुपये इतकी ठरवलेली आहे. तथापि, काही कृषि सेवा केंद्र चालक हे शेतकऱ्यांना एमआरपीपेक्षा जास्त दर सांगत असल्याबाबतची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर निदर्शनास आले आहे.
कृषी विभागाने तात्काळ त्याची दखल घेऊन व्हिडिओ संबंधित व इतर कृषि सेवा केंद्राची तपासणी केली. या तपासणी अहवाल त्रुटी आढळून आल्याने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी मंगलमूर्ती कृषि केंद्र हिंगोली, गजानन कृषि केंद्र हिंगोली, अनुसया ट्रेडर्स शिरडशहापूर, किसन ॲग्रो सर्विसेस ॲन्ड इरिगेशन शिरड शहापूर, स्वामी सुखदेवानंद कृषि सेवा केंद्र हिंगोली यांचे बियाणे विक्री परवाने निलंबित केले आहेत.