सुलतानपूर, पुढारी वृत्तसेवा: खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर शिवारातील किशोर मुरलीधर वेताळ या तरुण शेतकऱ्याने आज (दि.२४) तब्बल ३०० क्विंटल काढलेल्या कांद्यावर जेसीबी फिरवला.
किशोर वेताळ यांनी दोन एकर मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गादी वाफ्यावर ठिबकचा वापर करून एक लाख पंचवीस हजार रुपये खर्चून कांदा पिकविला होता. ऐन कांदा काढणीच्या वेळेस गारपीठ व अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर या शेतकर्यांने आशा न सोडता २० हजार रूपयांची मजुरी खर्च करून कांदा जमिनीतून काढला. बाजारातील भाव बघितल्यावर संपूर्ण कांदा विकून भाड्याचाही खर्च निघत नसल्याचे पाहिल्यावर व पुढील खरिपाच्या पिकासाठी जमीन तयार करण्यासाठी त्याने कांद्यावर जेसीबी फिरवण्याचा निर्णय घेतला, असे किशोर वेताळ यांनी सांगितले.
दरम्यान, शासन स्तरावरून कांदा नुकसानीचे दीड महिन्यापूर्वी तलाठी यांनी पंचनामे केले. परंतु, त्याची अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. गावातील इतर शेतकऱ्यांचे ही कांद्याचे मोठे नुकसान झाल्याचे प्रशांत वेताळ यांनी सांगितले.
हेही वाचा