तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर विकासांतर्गत सुरू असलेले पाडकाम ठप्प असल्याने भाविकांची गैरसोय होत आहे. pudhari photo
धाराशिव

Tuljapur temple : लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे दुर्लक्ष

तुळजापुरात भाविकांचे होताहेत हाल

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मागील दीड महिन्यापासून प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. मंदिर विकासाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले पाडकाम सध्या ठप्प पडल्याने मंदिर परिसरात मातीचे ढिगारे तसेच बांधकाम साहित्य विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाचेही लक्ष नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून धाराशिवचे जिल्हाधिकारी कार्यरत असून विश्वस्त मंडळात उपजिल्हाधिकारी, आमदार व नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. सुमारे 56 कोटी रुपयांच्या निधीतून विकासकामांना सुरुवात करण्यात आली; मात्र पाडकामानंतर पुढील कामे रखडल्याने भाविक, पुजारी व स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जागेअभावी अडचणींचा सामना करावा लागत असून कुलधर्म व कुलाचार विधींसाठीही पुरेशी व्यवस्था नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून उद्धट वर्तन होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.मंदिर प्रशासन केवळ पेठ दर्शन व आर्थिक व्यवहारांकडे लक्ष देत असून भाविकांच्या मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी व आमदारांकडून मोठ्या घोषणा करण्यात आल्या; मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग मंदावल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.मंदिरातील विकासकामे तातडीने पूर्ण करून भाविकांसाठी स्वच्छ, सुरक्षित व सुकर व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT