MLA Kailas Patil : Pay compensation of 1 thousand 68 crores based on crop harvest
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारे हेक्टरी ४० ते ४५ हजार रुपयांप्रमाणे एकूण १ हजार ६८ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विमा कंपनीने सादर केलेल्या तांत्रिक उत्पादनाच्या आकडेवारीत आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातील उत्पादनात मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानाच्या आधारे भरपाई देण्यात यावी. तांत्रिक उत्पादनाच्या निकषामुळे जिल्ह्याला केवळ सुमारे ३४० कोटी रुपये मिळण्याची शक्यता असून, पीक कापणी प्रयोगाच्या आधारे ही रक्कम १ हजार ६८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. खरीप २०२५-२६ हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले होते. जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान जिल्ह्यात २२० वेळा अतिवृष्टीची नोंद झाली असून, ५ लाख ७७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.
सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी करण्यात आलेल्या पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने घेतलेले आक्षेप जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय समित्यांनी फेटाळले आहेत. तरीही भरपाई वितरणात विलंब होत असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले आहे.
याबाबत तातडीने बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी व विद्यापीठातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत निर्णय घ्यावा आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा भरपाई देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.