Government's resolution of developed Dharashiv for a developed India
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी हा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेतकऱ्याच्या हातात पैसा आला आणि शेती सक्षम झाली, तर गावासह जिल्ह्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल. शेतकरी, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणाचा समतोल विकास साधत 'विकसित भारतासाठी विकसित धाराशिव' घडविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ८०व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्यासह अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त्ती योजना-२०२६'मधून जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ते १ लाख ८० हजार शेतकऱ्यांना १ हजार ४०० कोटी रुपयांपर्यंत लाभ अपेक्षित असून, आतापर्यंत १२ हजार २९४ शेतकऱ्यांच्या खात्यावर १०५ कोटी ८६ लाख रुपये जमा झाले आहेत. 'हरित धाराशिव' अभियानांतर्गत यंदा १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड करून जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून, जिल्ह्याच्या वार्षिक योजनेसाठी ४९४ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. गुंतवणूक परिषदेत ५६ उद्योगसमूहांशी सामंजस्य करार झाले असून, १ हजार ११८ कोटी रुपयांची गुंतवणूक व दोन हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.