धाराशिव : ऊस उत्पादनात वाढ करून एकरी 70 टनांवरून 100 टनांपर्यंत उत्पादन मिळविण्याच्या उद्देशाने धुता येथील तरुण व होतकरू शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील धुता येथे राबविण्यात येत आहे.
कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकातील एआय तंत्रज्ञान प्रकल्पात सहभागी झालेल्या 25 शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी कारखान्याच्या वतीने बारामती येथील कृषी प्रदर्शन तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित ‘ज्ञानयाग’ प्रशिक्षणासाठी नेल्यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळून मोठा फायदा झाल्याचे सांगितले.
या पाहणीवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे, संचालक नीलेश पाटील, भारत गुंड, सतिश मुंगळे, हरी डोलारे, लक्ष्मण चव्हाण, भारत सोनटक्के, फिरोज शेख, दिगंबर माने, एखंडे, पिंपरे आदी प्रगतशील शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.एकरी 100 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून तरुण शेतकऱ्यांनी उत्साहाने एआय तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.
शेतकऱ्यांचा हा पुढाकार पाहून सहकाररत्न अरविंद दादा गोरे यांनी समाधान व्यक्त केले असून या उपक्रमामुळे ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.