रत्नापूर : कळंब तालुक्यातील येरमाळा येथे बुधवारी (दि.19) रात्री येरमाळा-कळंब रोडवरील बांगर कॉम्प्लेक्समधील तीन दुकानांना शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत तिन्ही दुकानांतील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बुधवारी रात्री पोलीस पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांच्या गाडीतील कर्मचाऱ्यांच्या दुकानाच्या आत आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या आगीत एक कृषी सेवा केंद्र, एक मोटारसायकल गॅरेज आणि एक कृषी मशिनरी सेवा केंद्र अशा तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. दुकानांमधील यंत्रसामग्री, साहित्य व इतर वस्तू आगीत पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत.
आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत तिन्ही दुकानांतील बहुतांश साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेत अंदाजे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, नुकसानीचा नेमका आकडा संबंधित पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे.