धाराशिव : वाढते तापमान, घटते भूजलस्तर आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. जिल्ह्यात विविध विभागांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या 15 लाख वृक्षांपैकी 13 लाख 4 हजार 583 वृक्ष सध्या जिवंत असून त्यांची जिवंत राहण्याची टक्केवारी 86.97 इतकी आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे.
जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रकात म्हटलेआहे, की वन विभागाने लावलेल्या 4 लाख 73 हजार वृक्षांपैकी 4 लाख 68 हजार 595 वृक्ष जिवंत असून त्यांची टक्केवारी 99.07 आहे. सामाजिक वनीकरण विभाग आणि वन्यजीव येडशी विभागाने लावलेली अनुक्रमे 1 लाख 86 हजार व 67 हजार 500 रोपे शंभर टक्के जिवंत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नगरपालिका व नगरपंचायत विभागाने लावलेल्या 1 लाख 54 हजार 600 वृक्षांपैकी 1 लाख 36 हजार 434 वृक्ष जिवंत असून त्यांचे प्रमाण 88.25 टक्के आहे. ग्रामपंचायत विभागाने लावलेल्या 5 लाख 58 हजार 881 वृक्षांपैकी 4 लाख 9 हजार 825 वृक्ष जिवंत आहेत.
या विभागातील जिवंत वृक्षांचे प्रमाण 73.33 टक्के आहे.सिना कोळेगाव विभागाने लावलेल्या 60 हजार 19 वृक्षांपैकी 36 हजार 229 वृक्ष जिवंत असून त्यांची टक्केवारी 60.36 इतकी आहे. या विभागात अधिक प्रभावी संवर्धन उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट होत आहे.पर्यावरण तज्ज्ञांनी ‘एक व्यक्ती-एक वृक्ष’ ही संकल्पना स्वीकारून वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्याचे आवाहन केले आहे.