

हिंगोली : सर्व घरे वीजबिलमुक्त करणे तसेच विजेचे दर कमी करणे अशी महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे असलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत जिल्ह्यात 2 हजार 727 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती पॅनल बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील औंढा तालुक्यात 75, वसमत 540, हिंगोली 1754, कळमनुरी 271, सेनगाव 87 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती पॅनल बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यामुळे शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत जिल्ह्यात वीज ग्राहकांची वीजबिलातून मुक्तता झाली आहे.
सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून 2024 मध्ये सुरू झाली. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 2727 घरांवर सौर पॅनल बसविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत पात्र लोकांना 300 युनिट वीज मोफत देण्याचा मानस आहे. देशात सध्या दगडी कोळसा व पाण्यावर सुरू असलेल्या वीज निर्मितीवर ताण येत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून पारंपरिक वीजनिर्मितीवर भर दिला जात आहे.
शहरी भागात योजननेला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात अजूनही त्याचे प्रबोधन व जागृती करणे आवश्यक बनले आहे. केंद्र व राज्य शासनाने अनुदान वाढवून अधिकाधिक ग्राहकांना योजनेचा लाभ घेण्याची संधी द्यावी अशी मागणी होत आहे. सौर ऊर्जा योजना अनुदानावर आधारित आहे. एक किलो वॅटपर्यंत 30 हजार, 2 किलोवॅट 60 हजार व त्यापुढील किलोवॅटसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरात कर्ज सुविधाही उपलब्ध आहे. दरम्यान, ग्रामीण भागात स्मार्ट मीटरची भीती अजूनही मनातून गेलेली नाही, स्मार्ट मीटर म्हणजे अधिक वीजबील अशी मानसिकता तयार झाली असली तरी महावितरणकडून ग्राहकांची मानसिकता प्रभावीपणे अजूनही खोडून काढलेली नाही.
बहुतांश ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले असून, दिवसा अधिकाधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात सवलत मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचे प्रबोधन करण्याची गरज असली तरी तशी कार्यवाही कुठेही होताना दिसत नाही. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचेही प्रबोधन आवश्यक आहे. शून्य वीज बिलासाठी ही योजना प्रभावी असली तरी अद्याप ग्राहकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सूर्यघर योजनेचा उन्हाळ्यात निर्मिती होणारी वीज शिल्लक राहिल्यास पावसाळ्यात तिचा वापर होतो.
घराच्या छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे तयार झालेली वीज घरगुती वापरापेक्षा अधिकची असल्यास वीज बिल शुन्यावर येईल. सौरउर्जेची निर्मिती अधिकची असेल तर ती महावितरणला विकून उत्पन्न मिळविण्याचीही संधी आहे. छतावरील एक किलोवॅटच्या वीजनिर्मितीतून 120, दोन किलोवॅटच्या प्रकल्पातून महिन्याला 240 तर तीन किलोवॅटच्या प्रकल्पातून सर्वसाधारणपणे 360 युनिट विजेची निर्मिती होऊ शकते.
सर्वत्र विजेचा वापर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून सौर ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. वीजबिलातून सुटका होतेच, त्यापेक्षाही पर्यावरणाची हानी देखील थांबते. त्यामुळे प्रत्येकाने सौर ऊर्जेचा वापर करावा, शासनाकडून अनूदान देऊन सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले जात असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता आर.एम. चव्हाण यांनी सांगितले.