छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शाश्वत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ अभ्यासक ६५ वर्षीय राजेंद्र दाते-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा शुक्रवारी (दि.२१) तेरावा दिवस आहे. तरीही सरकारकडून या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला. गुरुवारी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपोषणस्थळी भेटीसाठी येणार असल्याचा निरोप दिला होता. मात्र, चार-पाच तास प्रतीक्षा करूनही ते आले नाहीत. यावरून मंत्री विखे कोणाला घाबरतात? असा सवाल करत मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी पत्रकार परिषदेत विखे-पाटील आणि सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील शहरात आले होते. त्यांनी स्वतः फोन करून उपोषणस्थळी भेटीसाठी येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ते आले नाहीत. कारण, आझाद मैदानावर हेच विखे-पाटील अध्यादेश घेऊन आले होते. याच उपोषणस्थळी एक अभ्यासक बसलेला आहे. त्यामुळे आमच्यासमोर येऊन विखे बोलू शकत नाहीत.
ते आले असते तर चर्चा झाली असती आणि दूध का दूध, पाणी का पाणी जनतेला कळाले असते, असा टोला पदाधिकाऱ्यांनी लगावला. मनोज जरांगे यांचे आंदोलन आणि दाते-पाटील यांचे आंदोलन वेगवेगळे नसून, दोन्ही आंदोलने मराठा समाजाच्या उन्नतीसाठी असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र मंत्री विखे यांना मराठा समाजाला धोका देण्याची सवय झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी बापूसाहेब शिरसाट, प्रा. शिवानंद भानुसे, योगेश शेळके, विजय काकडे, सुनील कोटकर, निखील काकडे यांसह आदी उपस्थित होते.
आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा !
दाते-पाटील यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये राजकीय आरक्षण वगळता ओबीसीप्रमाणे सवलती देणे, हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्राबाबत शासनाची भूमिका स्पष्ट करणे, एसईबीसी प्रवर्गाला ओबीसीप्रमाणे सुविधा देणे आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यांचा समावेश आहे. या मागण्यांवर शासनस्तरावर अद्याप ठोस चर्चा झालेली नसल्याने आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला-
डॉ. आंबेडकरांची क्रांती मोर्चाने घेतली भेट
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर शुक्रवारी शहरात आले असता मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. आरक्षणाच्या कायदेशीर मुद्द्यांवर डॉ. आंबेडकर यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरक्षणाची लढाई कायदेशीर मार्गान सुरू ठेवा, असा सल्ला त्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
जागरण-गोंधळ घालून सरकारचा निषेध
गेल्या १३ दिवसांपासून ज्येष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते-पाटील यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने उपोषणस्थळी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी वाघ्या-मुरळी यांनी सुमारे दोन तास जागरण-गोंधळ सादर केला.