Thugs create terror with swords in Mukundwadi; has the fear of the police disappeared?
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी परिसरात सराईत गुन्-हेगारांनी पुन्हा एकदा कायद्याचे धिंडवडे काढले आहेत. सराईत गुन्-हेगारांनी जयभवानीनगर, गल्ली क्र. १४ परिसरात मंगळवारी (दि.२३) मध्यरात्री सव्वाएक वाजेच्या सुमारास रस्त्यावर तलवार फिरवून, घरांवर दगडफेक करून दहशत माजवली. एक दुचाकी पेटवून देण्याचा प्रयत्न करत तोडफोड केली.
अजय राजकुमार कागडा आणि विजय राजकुमार कागडा अशी आर-ोपींची नावे आहेत. या दोघांनी रात्री तलवारीने परिसरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली.
फिर्यादी राजेंद्र शंकरराव आवारे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी (एमएच-२०-जीवाय ५१९६) आरोपींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. गाडीतील पेट्रोल काढून ती पेटवल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. केवळ गाड्याच नाही, तर या गुंडांनी परिसरातील घरांवर दगडफेक करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.
डायल ११२ वर माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अजय आणि विजय या दोघांना ताब्यात घेतले. झडती घेतली असता अजय याच्याकडे अडीच फूट लांब धारदार तलवार सापडली. पोलिसांनी तलवार जप्त केली असून, दोघांनाही अटक केली आहे. अजय हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाडसिंगपुऱ्यात माथेफिरूने कार फोडली
फिर्यादी शाहादू नामदेव पवार हे दूध विक्रीचा व्यवसाय करतात. पहाडसिंगपुरा भागातील अलमगीर मशीद परिसरात त्यांची बोलेरो गाडी (एमएच-१५-डीएम-७६४९) उभी होती. सोमवारी (दि. २२) पहाटे चारच्या सुमारास एका अज्ञात माथेफिरूने गाडीची तोडफोड करून नुकसान केले.
रात्रभर गुन्हेगारांचा मुक्तसंचार, पोलिसांची गस्त नावालाच शहराच्या विविध भागांत रात्रभर गुन्हेगारांचा मुक्तसंचार असतो. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या रात्रगस्त केवळ नावालाच उरल्या आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिन्सी, सिडको, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, सातारा आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत उशिरापर्यंत हॉटेल, टपऱ्या उघड्या राहत असल्याने टोळके त्याच परिसरात बसलेले दिसून येतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान याकडे पोलिस अधिकारी लक्ष देतील का अशी विचारणा सर्वसामान्यातून होत आहे.