This leader from Maharashtra contested the Vice Presidential election despite knowing he would lose
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांना दिलेल्या उमेदवारीची चर्चा सुरू असताना पराभव होणार हे माहिती असूनही काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 2002 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविली होती, हे विशेष.
कृष्णकांत हे उपराष्ट्रपतीपदावर असताना त्यांचा कालावधी पूर्ण होण्यास महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना त्यांचे 27 जुलै, 2002 रोजी निधन झाले. त्यामुळे उपराष्ट्रपतीपदासाठी मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचे सरकार सतेवर असल्याने व या अघाडीला बहुमत असल्याने एनडीए ठरविल तोच नेता उपराष्ट्रपती होईल असे चित्र जवळपास नक्की होते. भाजपने या पदासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते भैरोसिंह शेखावत यांना उमेदवारी दिली. काँग्रेस व अन्य पक्षांनी सुशीलकुमार शिंदे यांना उभे केले होते. मतांचा अंदाज पाहता शेखावत यांचा विजय निश्चित होता.
12 ऑगस्ट, 2002 ला या पदासाठी निवडणूक झाली. त्यात अपेक्षेप्रमाणे शेखावत हे शिंदे यांचा पराभव करून निवडून आले होते. लोकसभा आणि राज्यसभेच्या 759 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला. त्यात शेखावत यांना 454 (59.82 टक्के) तर शिंदे यांना 305 (40.18 टक्के ) मते मिळाली होती. अर्थात ही निवडणूक लढविण्याचे शिंदे यांना काही कारणही नव्हते. परंतू पक्षाचा आदेश आणि धर्मांध शक्तीविरोधातील लढा हे आपण निवडणूक लढविण्यामागील कारण असल्याचे शिंदे यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले होते. आपला पराभव दिलखुलासपणे स्वीकारत त्यांनी शेखावत यांना शुभेच्छाही दिल्या होत्या. त्यानंतर झालेल्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत शिंदे यांना उभे करावे असा प्रस्ताव काँग्रेसचा होता. या निवडणुकीत मिसाईल मॕन ए. पी. जे. अब्दूल कलाम यांना उभे केल्यामुळे विचार आपोआपच बारगळला.
१९८४ मध्ये आर. व्यंकटरमण् हे काँग्रेसकडून उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार होते. ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक बापू कांबळे हे त्यांच्याविरोधात रिपाइंकडून उभे होते. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलेले सी. विद्यासागर यांचेही नाव उपराष्ट्रपतीपदासाठी घेतले जात होते. याशिवाय तत्कालिन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या नावाची चर्चा राष्ट्रपतिपदाकरिता होती. राजकीय कारणास्तव त्यांची नावे पुढे सरकू शकली नाहीत. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर असलेले डाॕ. शंकरदयाळ शर्मा हे उपराष्ट्रपती व पुढे राष्ट्रपती झाले. महाराष्ट्रात राज्यपालपदावर असणारी व्यक्ती उपराष्ट्रपतीची निवडणूक लढविण्याची शर्मा यांच्यानंतरची दुसरी वेळ. आतापर्यंत या पदावर १६ नेते कार्यरत होते. त्यापैकी चार निवडणुका बिनविरोध झाल्या हे येथे उल्लेखनीय.