The warning issued to Mahavitaran has been forgotten
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी विद्युत तारांवरील इंटनेट, टीव्ही केबल काढताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महावितरणने कडक कारवाईचा इशारा देत त्या दरम्यान केबल काढून नोटिसाही पाठवण्यात आल्या होत्या. या इशाऱ्याला केराची टोपली दाखवत इंटरनेट, टीव्ही केवल चालकांनी पुन्हा विद्युत तारांवर केबल टाकणे सुरू केले आहे. या धोकादायक केबलमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
महावितरणने अनेकदा इंटरनेट, टीव्ही केबल काढून टाकण्याच्या सूचना संबंधित ऑपरेटर्सना दिल्या, परंतु ते ऑपरेटर्स महावितरणला जुमानत नसल्यामुळे केबलचे जाळे शहरभर पसरले आहे. वादळ वाऱ्यात या केबलमुळे विद्युत तारांत अनेकदा घर्षण होऊन या ठिकाणी आगीच्या ठिणग्या रस्त्यावर पडत आहेत, तसेच अनेकदा या केबलमध्ये विद्युत प्रवाह उतरून अपघातही होत आहेत.
अशीच एक घटना दोन वर्षापूर्वी घडल्याने महावितरण झोपेतून जागे होते कडक कारवाईचा इशारा दिला होता. दरम्यान दिवसेंदिव विद्युत तारांवर केबलचा विळखा आणखी घट्ट झाला आहे. यात महावितरणला मात्र त्यांनी दिलेल्या इशाऱ्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
इंटरनेटचे डब्बेही खांबावर
विद्युत तारांवर केवळ केबलच नाही तर मसूद कॉलनी व परिसरात चक्क विद्युत खांबांना इंटरनेटचे वितरण बॉक्स लावले होते. ही बाब नागरिकांनी लक्षात आणून दिली. मात्र त्या परिसरातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडली नाही. ही बाब निदर्शनास आणून देताच तो बॉक्स काढून टाकण्यात आला असला तरी खासगी केबलधारक महावितरणच्या मालमत्तेचा धोकादायकपणे वापर करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
शहरभर केबलचे जाळे
विद्युत तरांवर केबलचे जाळे हे शहरभर पसरले आहे. दर शुक्रवारी देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येतात, परंतु इंटरनेट, टीव्ही केबल मात्र त्यांच्या निदर्शनास कशी येत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही केबल टाकण्यास महावितरणच्या कर्मचाऱ्यांचीच मूक संमती असल्याची चर्चा सुरू आहे.