The heat of the sun has increased again, the temperature has reached 38.5 degrees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा कडाका वाढल्याने शहरात उष्णतेची तीव्रता जाणवू लागली आहे. सलग दोन दिवस बरसलेल्या अवकाळी पावसानंतर शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत असून, गुरुवारी (दि.२६) कमाल तापमान ३८.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. किमान तापमानातही वाढ नोंदवली गेली असून, ते २३.४ अंशांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, हवेत केवळ २४ टक्के आर्द्रता नोंदविण्यात आली असून, उकाड्यात वाढ झाल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत.
यंदा मार्चच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात झपाट्याने वाढ झाल्याने पारा ३७अंशांच्या पुढे गेला. त्यानंतर सलग दोन दिवस बरलेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र आता पुन्हा तापमानाचा तडाखा वाढला असून, शहराचा पारा ३८ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असून, दुपारी उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वर्दळ कमी झाल्याचेही दिसून आले. वाढत्या उन्हामुळे दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेकांनी डोके व चेहरा झाकण्यासाठी रुमाल, टोपी आणि स्कार्फचा आधार घेतल्याचे दिसून येत आहे. यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच पारा चाळीशी गाठणार
गतवर्षी फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवड्यातच उन्हाच्या झळा बसायला लागल्या होत्या. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अवकाळी पावसामुळे तापमानात हळूहळू वाढ होत असून, लवकरच शहराचे तापमान ४० अंशांवर जाण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.