Temperature Rise : कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता
The maximum temperature is likely to rise up to 38 degrees.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सलग दोन दिवसांच्या पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर आता शहराचे तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून, दमट हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत कोरड्या हवामानाचा अंदाज असून, काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हाभरात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार अवकाळी पाऊस बरसला. यासह काही ठिकाणी मोठ्याप्रमाणात गारा पडल्या. त्यामुळे तापमानाचा पारा घसरला होता. मात्र आता कमाल व किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत आकाश मुख्यतः स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
वाढत्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने नागरिकांना उष्णतेचा चटका बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. या कालावधीत कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असून, किमान तापमान १८ ते १९ अंशांदरम्यान राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच सापेक्ष आर्द्रता १४ ते ५९ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ७ ते १४ किलोमीटर प्रतितास राहणार आहे.
दरम्यान, २५ ते ३१ मार्च या कालावधीत जिल्ह्यात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून, आकाश स्वच्छ राहील. पर्जन्यमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान सरासरी-पेक्षा किंचित कमी तर किमान तापमान सरासरीच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कमाल तापमाना पारा वाढणार असून उन्हाचा चटका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले

