The car caught fire, but five people narrowly escaped
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : आग लागल्याने कार जळून खाक झाली. तर चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील पाचजण थोडक्यात बचावले. ही घटना शनिवारी (दि. ३१) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावरील पालोद फाट्याजवळील पुलावर घडली.
कारमधून क्र. (एम एच- २८, सीए- ७७०७) नंदन खेडेकर, अशोक खेडेकर, सुशीला खेडेकर, अंजली मगर व बाळू डोईफोडे (सर्व रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) हे जळगावहून देऊळगाव राजाकडे जात होते. पालोद फाट्याजवळील खेळणा नदी पुलावर अचानक कार बंद पडली. त्यानंतर इंजिनमधून धूर निघू लागल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ कारमधील लोकांना बाहेर काढले.
तर यादरम्यान कारला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्रावतर धारण केल्याने कार जळून खाक झाली. माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लहू घोडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर जाधव, सतीश पाटील, दीपक इंगळे, वैजिनाथ चव्हाण यांनी धाव घेतली. तर सिल्लोड नगरपरिषदच्या अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करून आग विझवण्यात आली.
वाहनांच्या रांगा
दरम्यान महामार्गावर कारला आग लागल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. तर कारला लागलेल्या आगीचे लोळ पाहून परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कारची आग विझवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेने महामार्गावरील वाहतूक जवळपास तासभर ठप्प झाली होती.